अर्चना

तिच्या पिलाकडे बघून राहून राहून वाईट वाटतंय. गळ्यात फास अडकवून घेताना नजरेसमोर एकदाही त्याचा चेहरा आला नसेल ? त्याचे विचार आले नसतील डोक्यात? एवढ्या अफाट जगात आपलं पिल्लू एकटं पडेल त्याच्याकडे कोण बघेल? परक्या देशात आहोत आपण आपलं बाळ काय करेल? हे आणि असले बरेचसे प्रश्न अजूनही मनात घोळतायत .

मी एवढे दिवस राहत असलेल्या आधीच्या अपार्टमेंटमधल्या आमच्याच ग्रुपमधल्या एकीने गळ्याला फास लावून घेतला.. हे ऐकताना ५० चेहरे तरळून गेले डोळ्यापुढे, नक्की कोण हे कळेपर्यंत सगळ्या मैत्रिणी दिसायला लागल्या , सहजच बोलता बोलता बोलून गेलेल्या मनात सलणाऱ्या एकेकीने सांगितलेल्या स्वतःच्या गोष्टी आठवल्या. पंधराच मिनिट लागली नक्की कोण ते कळायला. पण त्या पंधरा मिनिटातली ही अवस्था आणि कोण ते कळल्यावर विश्वासच बसेना.

ती..... एवढी हसतमुख आणि बडबडणारी, सारखी बिल्डिंगभर फिरणारी. मस्तपैकी ढोलक वाजवणारी, त्याच्या तालावर मनसोक्त नाचणारी. स्वतः: फारसं शिकलेली नव्हती पण आपल्या मुलाने खूप शिकावं स्वतः:ला जमत नसतील त्या गोष्टीत प्रसंगी शेजारणींची मदत घेऊन त्याचा अभ्यास घेणारी.

एवढं कायच झालं असेल तिला? काय डाचत असेल? कोणाशीही बोलाव असं न वाटता सरळ स्वतः:ला संपवण्याचा निर्णय घेण्यापर्यंत तिला काय त्रास होत असेल? एक ना अनेक प्रश्न डोक्यात गरगरतायत.

बरं हे सगळं करायच्या आधी मुलाला घेऊन बाहेर पार्किंगमध्ये फिरली, त्याच्यासोबत खेळली, बाकीच्या बायकांशी गप्पा मारल्या आणि नवरा काही कामासाठी बाहेर गेला तेवढ्या वीस मिनिटात सगळा खेळ खलास.

कोणी म्हणतं दोघांच पट्त नव्हतं, कोणी म्हणत तिला भारतात जायच होतं, कोणी म्हणत त्यांचा बराच जुना प्रॉब्लेम होता, माणूस अतिशय चिक्कू आहे पैसा द्यायचा नाही, तिला घरी पाठवायचा नाही, वागणं नीट नाहीये त्याचं. हे असं असताना , बाई नवऱ्याची काळजी घ्यायला विसरली नव्हती;जाताना चिट्ठी सोडून गेली "माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाहीये" .

"माझी आई कुठय?" असं विचारल्यावर, त्या पाच वर्षाच्या बाळाला " तुझ्या आईला दवाखान्यात नेलय; हे खोटं सांगताना; माझ्या बाकीच्या मैत्रीणिंची काय अवस्था झाली असेल ही कल्पनाही करवत नाहीये. ज्यांनी तिला लटकताना बघितलं त्यांची तर त्याहूनही वाईट अवस्था .

ही बातमी ऐकल्या ऐकल्या प्रत्येकाने तिला शिव्या दिल्या, हे काय असलं वागणं म्हणून, पण मला राग नाही आला, वाटलं , किती सहन केल्यावर या निर्णयापर्यंत आली असेल ती.

अजूनही सुटका नाहीच झालेली तिची. सगळ्या औपचारिकता पूर्ण होईपर्यंत अजून ४-५ दिवस लागणार आहेत. घरचे कोणीही येउ शकत नाहित. ही अजूनच वाईट गोष्ट.

जीव गेला तरी देहाचे भोग संपलेले नाहियेत .

श्शॉई :)

सक्काळी साधारण आठ ते साडेआठच्या दरम्यान फोन वाजतो, आणि साहेब बोलायला लागतात"
मन्नाSSSSS....हSSं.....पापाशSS...(पाणी)बाबाशSS(बाबा जे काही खातोय ते बाबाश)....भाSSता...आssई स्श्यांबी(शांभवी)...हSSम्मा....आवाSSझ्य...आल्लाहूबर्र्र्र्र्र्र्र.....(हे म्हणजे समोरच्या मशिदीतन येणारा आजानचा आवाज) :) हे साहेब म्हणजे कोण तर माझ्या भावाचा दीड वर्षाचा मुलगा.
उजाडलं की बाबाचा ऑफिसचा फोन घेऊन आई आणि बाबाच्या मागे याची भुण-भुण सुरू होते.
भावाच्या ऑफिसचे फोन चालू होतात सकाळपासूनच. एके दिवशी त्यांनी मला फोन लावलेला असताना सहजच या साहेबांना फोन दिला तर तेव्हा पासून ठराविक वेळ झाली की याचं गाणं सुरू होतं मन्ना फोन मन्ना फोन म्हणून.

दिवसभर घरभर दंगा करत फिरत राहतो, माझी वहिनी अक्षरशः: हैराण होते त्याला आवरून आवरून. खरंच आपल्याला बाळकृष्णाच्या एकेक खोड्या ऐकताना काय मजा वाटत असते. पण आमच्या या कृष्णाचे प्रताप आवरायचे म्हणजे बाप रे बाप!

एकदा असंच फारच त्रास दिला त्याच्या आईला त्यानं, म्हणून थोडंसं धमकावलं मी त्याला मग इवलंसं तोंड करून उजवा हात डावा कान डावा हात उजवा कान असे कान पकडून साहेब स्वतः: होऊन समोर येऊन उभे राहिले, बोलायचं नाव नही शेवटी मीच विचारलं काय रे काय करतो?" , तर म्हणे "मन्ना श्शॉई अश्ज गु....ब्बॉय(अक्षज गुड ब्बॉय)" :)

सध्या मी भारताबाहेर आहे. आठवण येते रे बाळा तुझी :)

गोकुळवाटा

दोघेही तुडवित गेलो, त्या अवघड गोकुळवाटा
नात्याचा आपुल्या राधे भलताच इथे बोभाटा

राधा - कृष्ण हा एक अनुबंध.. प्रेमभावाची लोकविलक्षण गाथा.
युगानुयुगे अम्लान राहिलेली कथा.
शतकानुशतके हा कवींचा आवडता विषय राहिलेला आहे.
कुणी त्यात भक्ती पाहिली, कुणी प्रीती. कृष्णाची रासक्रीडा ही केवळ देहक्रीडा नव्हती तर तर ती एक भावलीला होती.
चित्त प्रसन्न करते ती राधा.. आणि चित्त आकर्षित करतो तो कृष्ण.
राधा कृष्णाची भक्त, प्रेयसी, सखी की याहून अधिक काही?
प्रेमाची अविरत धारा म्हणजे राधा....
ज्याचे ह्रदय कृष्णाचे त्याचीही एक कुणीतरी राधा असतेच आणि राधाह्रदयात कृष्ण असतोच.

राधा-कृष्ण या नात्याचा काव्यात्म वेध म्हणजेच गोकुळवाटा.
प्राध्यापक श्री. लक्ष्मीकांत तांबोळी यांचा 'गोकुळवाटा' हा काव्यसंग्रह म्हणजे राधाकृष्णाच्या नात्यातलं गूढ समजून घेण्याच्या ध्यासात कवीला सापडलेली अशी ही गोकुळवाट. कविता आणि त्या कवितांचं निरुपण असं वेगळंच स्वरूप. काव्यसंग्रहाची ही एवढीच ओळख पुरेशी. पण नुसत्या काव्यसंग्रहाचीच नाही, तर त्याहीपुढे जाऊन डॉ. पराग श्रीराम चौधरी यांनी सरांच्या शब्दांवर केलेले सुरांचे सुरेल संस्कार. आणि प्रत्येक कवितेचं सरांच्याच शब्दातलं निरुपण ऐकणं म्हणजे फार मोठी पर्वणीच.

'गोकुळवाटा' या नावातच संमोहित करण्याच सामर्थ्य आहे. कोजागिरीच्या दिवशी मला सापडलेली ही वाट तुमच्यापर्यंत पोचवायचा एक प्रयत्न. आजपर्यंत राधा-कृष्ण या विषयावर कित्येक प्रकारचे कार्यक्रम झालेही असतील, पण ही वाट आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जाते आणि आपण भानावर येतो तेव्हा नि:शब्द झालेलो असतो... "

कार्यक्रम सुरु होतो अर्थातच श्रीकृष्णाच्या लाडक्या बासरीच्या सुरांनी, आणि त्या सुरांची सोबत करत डॉ. पराग आणि त्यांचे सहकारी श्रीकृष्णाचं नामस्मरण करतात. हे संपत असतानाच तांबोळी सरांच्या निरूपणाला सुरवात होते "गोकुळवाटेवर चालणारे आम्ही, आपलं मन:पूर्वक स्वागत करत आहोत." इथे कृष्ण कसा हे सांगताना तांबोळी सर श्री वल्लभाचार्यांच्या ओळींनी सुरवात करत म्हणतात, "कृष्ण कसा? तर ज्याचं सगळंच मधुर आहे असा...." पहिल्या गीताच्या आधी ते म्हणतात "घरोघरी सत्यभामा, रुक्मिणी भेटतातच. भेटत नसते ती राधा. आपणापैकी कुणाला ती भेटली असेल तर तुम्ही भाग्यवान. नसेल तर मनातली राधा सांभाळावी, तिला बाधा होईल, असे काही करु नये. प्रेम असल्याचं रुक्मिणी किंवा सत्यभामा यांनाच पटवून द्यावं लागतं. राधेला त्याची गरजही नसते." पुढे ते म्हणतात, "तुम्ही आम्ही कोणी वेगळे नाहीत हो... अपुल्यातच असते राधा, अपुल्यातच असतो कृष्ण.. मन वृंदावन करण्याचा इतुकाच आपला प्रश्न..!"
व्याधाचा बाण लागल्यावर त्याला सत्यभामा किंवा रुक्मिणी आठवत नाहीत. त्याला आठवते ती राधा.. आणि तो म्हणतो... आपल्या सुमधुर आवाजात डॉ पराग इथे पहिल्या गीताला सुरवात करतात.

"फार उशीरा आलिस राधे रास येथला सरला
गोकुळातला कृष्ण तुझा तो पहिला नाही उरला
विजन जाहले कुंजवनाचे कदंब सुकले सारे
कृष्णाअंगी भरले आता कुरुक्षेत्रिचे वारे
नाचुन नाचुन मोर थांबले झडले सर्व पिसारे
काजळकिमया ओसरली ग डोहकाळिमा पसरे
उशीर झाला तुला राधिके, कृष्ण बुडाला डोही
मोरपीस हरवले कुठे ते, तोच शोधितो बाई"

राधा आली, पण तो कृष्ण? कृष्ण पहिला राहिलेला नाहिये, मोरपीस हरवलंय आणि त्या मोरपिसाच्या शोधात राधा हिंडतेय. यमुनातीरी वणवण भटकतीये. तो नाहीये पण तिला वाटतंय तो आहे, तो इथेच आहे, आणि ती म्हणते,
" यमुनातीरी घनवनराई
तेथे श्याममुरारी
राधेसाठी सदैव त्याच्या
ओठांवर बासरी
विरहविदग्धा व्याकुळ राधा
कृष्ण कृष्ण जपणारी..."

तर अशी ही कृष्णासाठी फिरणारी राधा ही एकच नाही अश्या गावोगाव असंख्य राधा आहेत राधाकृष्ण हा एक सहवासयोग आहे,"मीरेला ऐतिहासिक आधार तरी आहे पण राधा.... ही तर गाथांमधली, लोककथांमधली एक सर्वसाधारण स्त्री. प्रीतीची रीत मीरेकडून शिकावी की राधेकडून?" तर इथे राधेची सरशी होते आणि सर राधेबद्दल बोलताना म्हणतात "प्रेमाची अविरत धारा म्हणजे राधा! "
"प्रेमाचा अर्थ कळाया, लागते न जग धुंडाया" ते आपले आपल्यालाच कळते आणि गीत सुरु होतं..

"तू गाथेमधली राणी
यमुनेचे अवखळ पाणी
तू पाखरचोचीमधली
की तहान केविलवाणी?
मी दिले न काही तुजला
तू मागितलेही नाही
प्रेमाची तुझिया राधे
ही रीत अनोखी बाई!
प्रेमाचा अर्थ कळाया
लागते न जग धुंडाया
वृंदावन, गोकुळ अजुनी
येतील साक्ष ही द्याया"

पुढे राधेबद्दल बोलताना ते म्हणतात,"सार्‍या अस्तित्वाला मिटवू्न टाकून गोकुळमिठीत शिरायचे हे केवळ राधेलाच शक्य होतं. कृष्णाला भेटायला जाण्यासाठी राधा शृंगार करते, नटते-मुरडते, आणि हे सगळं बघण्यासाठी तिला आरशाची गरज भासतच नाही. ती कुठे बघत असेल? राधा आरसा बघत नाही, ती स्वतःला कृष्णाच्या डोळ्यात बघते. तिच्यासाठी आरसा कृष्णच आहे. अशी ही कृष्णमयी राधा.. तिच्या श्वासात कृष्णाचाच वावर.. पदर धरणारा, पदर ओढणारा, पदर उडवणारा आणि पदर धरून चालणाराही कृष्णच. कृष्णाभोवती फिरणार्‍या गोपिकांना गणती नाही. पण राधेचे काही औरच. कृष्णाला मिठीत घेण्यासाठी ती उत्सुक, त्याहून तिच्या मिठीत येण्यासाठी कृष्ण आतूर.... हे राधा ओळखून आहे. असा हा राधेचा पारदर्शी चांदणशेला....."

राधा म्हणते,
"डोळ्यांचा तुझिया ऐना
मी त्यात पाहते मजला
भाळावर झुलते बिंदी
मी त्यात जडविते तुजला
नि:श्वास श्वास हे माझे
नित त्यात तुझा रहिवास
खेळली न तसली कोणी
मी असा खेळले रास
तुजसाठी पैंजण पायी
तुजसाठी काजळ डोळां
भेटींस तुझ्या मी येते -
घेउनिया चांदणशेला"

राधाकृष्णाचे नाते मोठे लोकविलक्षण आहे आणि तितकेच मोहक. युगायुगांची प्रेमगाथा. दोघेही परस्परांचे आधार नि एकमेकांवाचून निराधार. 'गीत' आणि 'गीता' यात केवळ एका कान्याचा फरक पण केवढा मुळालाच हादरा बसतो! गीतात गुंतायचे की गीतेत अडकायचे -भोग की त्याग? संग की निसं:ग? कृष्णानी गीत गायले ते राधेसंगे आणि गीता सांगितली ती राधा नसताना... आता काय घ्यावे हे ज्याने त्याने ठरवावे.

संगीतात एक राग सारंग आणि त्याच्याच भिन्न प्रकारातील एक वृंदावनी सारंग.... ध्यास, वेड, तंद्री, नाद, छंद हे सारे मोठे गोड पण तितकेच ते जीवघेणे. बरेच दिवस झालेत आपली आणि राधेची भेट झाली नाही हे जाणवतं त्याला आणि तो म्हणतो..

भेटीस आपुल्या राधे
किती युगे लोटली सांग?
मी अजून आळवित बसलो
हा वृंदावनी सारंग!
तू कळी, देठ मी राधे
आधार कुणाचा कोणा?
फुलताना कधी न कळते
कळते पण ओघळताना
तू 'गीत' दिले मज बाई
मी केली त्याची 'गीता'
कान्हाच होऊनी 'काना'
गीतेत अडकला आता!

या आणि अशा अनेक कवितांमधून कधी राधेचं तर कधी कृष्णाचं स्वगत, सरांच्या शब्दांतून आणि डॉ. पराग यांच्या सुरांतून रेशीमलडींसारखं उलगडत जातं. आणि कळसाध्यायाची वेळ, शेवटी ती वेळ येतेच -निरोपाची.... डॉ. पराग भैरवी चे सूर लावायला लागतात, तर सर म्हणतात,"हातातली काठी सोडावी आणि मुरली घ्यावी.. गोकुळवाट आपोआप सापडत जाते"..

"योगेश्वर मी अखिलाचा
पण शरण तुला मी आज
हातात तुझ्यास्तव मुरली
हा मोरपिसांचा साज!
तू मला घुसळले राधे
अलवार कोवळे धागे
श्वासांच्या झुल्यावरती
हिंदळलो आपण दोघे!"

कार्यक्रम संपलेला. सगळेच प्रेक्षक संमोहित झाल्यासारखे तसेच बसलेले. आम्ही चौकशी करतो - पुन्हा कधी आहे हा कार्यक्रम?

वेळूबन गावोगावी
वृंदावन एकच असते,
काठ्या तर हातोहाती
मुरली पण एकच असते!

काव्यसंग्रह : गोकुळवाटा : प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी
संगीत/गायन : डॉ. पराग श्रीराम चौधरी
सौ. मीनाक्षी पराग चौधरी

या रचना प्रा.लक्ष्मीकांत तांबोळी यांची परवानगी घेउनच इथे उद्धृत केल्या आहेत. कुणाला या पुन्हा वापरायच्या असतील तर पूर्वसंमती आवश्यक
************************************************************************************

कधी कधी

कधी कधी
एखादं पुस्तक वाचता वाचता
गुंतून जातो आपण
त्यातल्या पात्रात स्वतःला पाहतो;
अगदी फार हळवं होऊन कासावीस होतो तर
कधी मोहरूनही जातो.
आणि...
पुस्तक संपत वाचून
अचानक प्रचंड पोकळी
काहीशी तगमग..उलघाल
मग, आपण बजावतो स्वतःला
संपलीये कथा आणि बंद केलंय पुस्तक!
त्या पुस्तकाला थोपटतो जरासं
आणि हळूच बाहेर पडतो त्यांतून
होतं असं..कधी कधी!