आता आम्हा सगळ्या औरंगाबादकरांचा लाडका म्हणजे भोलेशंकर चाटवाला. खरंतर सहजासहजी सापडेल किंवा पोचता येईल अश्या ठिकाणी अजिबात नाहीये पण याच्याकडच्या पदार्थांची चव एकदा एखाद्यानी घेतली तर सहजा सहजी दुसरीकडे भेळ,दहिपुरी इत्यादी पदार्थ खायला जाणार नाही याची फुल्ल ग्यारंटी . याच्याकडची भेळ म्हणजे आहाहा.......
भेळेसाठी केलेल्या चटण्या बघुनच तोंडाला पाणि सुटायला लागतं. हिरवी चटणी,मग गोड चटणी आणि लाल चटणी. ही भेळ एक डिशभर म्हणजे अजून काहि खायच विसरायचच, एवढी जास्त quantity असते भेळेची. तसे याच्याकडचे सगळेच पदार्थ छान असतात पण अजून एक आवर्जुन सांगण्यासारखा पदार्थ म्हणजे दही बटाटा पुरी. सहा का आठ पुऱ्या असतात एका डिशमधे पण हे ही पोटभरेल एवढं. यातल्या दह्याचं आणि गोड चटणीच झालेलं मिश्रण फारच चवदार लागतं. ही दहिपुरी खाताना तंद्रीच लागली पाहिजे एवढी भन्नाट चव असते. औरंगाबाद शहराच्या मध्यवस्तीत अप्पा हलवायाच्या दुकानासमोर आहे हे चाटभांडार.

गेली कित्येक वर्ष फक्त थाळीच देऊनही अजून तेवढ्याच जोरात चालणारं माझं अतिशय आवडतं ठिकाण म्हणजे bus-stand जवळचं भोज राजस्थानी भोजनालय. ४०ते५० रुपयात अमर्यादित थाळी. सुरवातीला जलजीरा, २सुक्या भाज्या, २ रस्सा भाज्या, डाळ, कढी, १ स्नॅक (बटाटावडा, समोसा किंवा ढोकळा) याच्याबरोबर चटणी, ठेचा, पापड, सॅलड, गरमा गरम आणि मऊ असे तुप लावलेले फुलके, बाजरीची छोटीशी रोटली (भाकरी) यावरही तुप. यातल्या सगळ्या भाज्या छान असतात पण मला खास आवडते ती इथली कढी. फारच चविष्ठ असते अगदी पुन्हा पुन्हा घेऊन सुद्धा समाधान होत नाही. आणि शेवटी भात / खिचडी तुम्ही दोन्हीही टेस्ट करु शकता. मस्त घोटून केलेली सरसरीत खिचडी आणि वर पुन्हा तूप. इथलं वैशीष्ठ म्हणजे सगळा स्टाफ राजस्थानी वेशभुषेत असतो. आणि लांब लांब मिशा
असलेला मॅनेजर (मालक?) स्वत: पुन्हा पुन्हा येउन घरच्यासारखा आग्रह करत असतो.
रेल्वेस्टेशनरोडला असणारं फुड लव्हर्स आणि जालनारोडला असलेलं मास्टर्स कुक ही हॉटेलंपण माझ्या आवडत्या होटेल्सपैकी आहेत. हल्ली फौजी ढाबा जास्त लोकप्रिय झालाय पडेगावच्या थोडंस पुढे असलेला हा ढाबा फॅमीली पार्टीसाठी एकदम मस्त इथे लंच ला जाऊन दिवसभर मस्त टाईमपास करता येतो. मुलांना खेळायला खेळणी बसवलीयेत. पण हा ढाबा किंवा आजकालचे नविन ढाबे व्हायच्या आधीचा अस्सल ढाबा म्हणजे मिटमिट्याला असणारा पाशाभाईचा ढाबा फार सुरेख चव होती याच्याकडच्या चिकन मसालाची. आता हाही कमर्शीअल झालाय :-(.

साधारण नोव्हेंबर डिसेंबरमधे लायन्स क्लबतर्फे आयोजीत होणा-या आनंदनगरीमधे मिळणारा पापड कधिही न विसरता येणारा आहे. अजुनही मिळतो. फक्त या पापडासाठी पुन्हा एकदा या दिवसात औरंगाबादला जायची इच्छा आहे. :-)

सध्या माझं फ़ेवरेट असणारं हॉटेल म्हणजे वाळुजला असणारं लुधियाना ढाबा पिवर पंजाबी चव असते सगळ्या पदार्थांना, आणि हवं तसं बनवूनही देतो हा.

आणि शेवटी औरंगाबादची शान असलेलं तारा पान सेंटर कुठेही कधीही स्पेशल जेवण झालं की तारापान ची पानं घरी आलीच पाहिजेत असा दंडकच आहे बहुतेक औरंगाबादकरांचा. आणि तीथे जाऊन पान खाणं हा तर एक राजेशाही अनुभव असतो. गाडी तारापानच्या जवळपास उभी करायची कि लगेच याचा माणुस येउन order घेतो, पाचच मिनिटात सुंदर तबकामधे गुलाबाच्या पाकळ्या,चांदिचा वर्ख लावलेली रसदार पानं तुमच्या समोर हजर असतात. अगदी नवाबी थाटात :-). पोटभर जेवून पान चघळताना सहजच वाटून जात, सुख सुख म्हणतात ते याहून वेगळ ते काय असेल बरं. :-)

तशी ही खाद्य यात्रा न संपणारी आहे कारण चवी बदलतात, हात बदलतात आणि आपण खातच असतो . बरचसं राहून गेलय ब-याच आठवणी धुरकट झाल्या आहेत बरीचशी नावं आता आठवतही नाहियेत, हो पण चव मात्र जिभेवर रेंगाळत असते अजूनही. म्हणून किमान सध्या जेवढ आठवलं तेवढतरी जपायचा एक छोटासा प्रयत्न.

तुर्तास औरंगाबाद खाद्ययात्रा ईथेच समाप्त