मन चकव्याचे फूल

मन एक सान पक्षी
मन रानभर नक्षी
मन पिसारा पिसारा
मन मोठाच पसारा

मन भीती मन प्रिती
मन भुणभूण किती
मन आठवे साठवे
पुन्हा जुनेच नव्याने

मन कैरीची गं फोड
नाही कसलीच तोड
मन साजण साजण
गाली चढते तोरण

मन माय मन तात
मन सखीचा गं हात
मन जखम जखम
मन घालते फुंकर

मन भास मन त्रास
लक्ख उजेडाची आस
मन चकव्याचे फूल
देई पुन्हा पुन्हा हूल

--श्यामली

कवडसा

कधी कधी भल्या पहाटे अंगणात तर कधी थोडंसं उशिरा चहाच्या टेबलाजवळ भेटायचा. स्वैंयपाकघराच्या दाराच्या फटीतून येणारा तो इवलासा कवडसा. थंडीच्या दिवसात उबदार उन्हाची शाल घेऊन तांसतास घुटमळायचा अवतीभवती. माझं गुणगुणत त्याला न्याहाळणं चालायचं. उन्हं डोक्यावर आली की हा इथून थोडं सरकून पुढल्या घरात मग अंगणात मग फाटकाच्याबाहेर असं करत करत दिसेनासा व्हायचा.
कधी कधी रात्रीच पण करमायचं नाही बहुदा त्याला,चांदण्यांचं हसू घेऊन यायचा बऱ्याचदा.तेव्हा तर काय भरपूर रिकामा वेळ असायचा छान गप्पा व्हायच्या. तो त्याच्या प्रवासाबद्दल सांगायचा मीही बोलायचे काहीबाही.
घराची डागडुजी झाली, कुठेकुठे पडलेल्या फटी वगैरे बुजवल्या गेल्या, रंगबिंग देऊन झाला... मस्त वाटतंय नवं नवं...
कवडसा तेवढा हरवलाय मात्र!

निरोप..स्वागत

जसा ओलांडला काल
तसा जाईल आजही
नाही उद्याची प्रतीक्षा
तो येईलही जाईलही


आता संपतच आलय वर्ष म्हणल्यावर द्यायचा त्याला निरोप, नाहितरी दुसरं काय हातात असतं आपल्या? वेळेला बांधु शकत नाही आपण केवढं मोठी गोष्ट आहे खरच. असं झालं असतं तर? कित्येक क्षण तसेच थांबवून ठेवले असते आपण पुढे गेलोच नसतो त्या क्षणाच्या. पण मग आज बघायला नसताच मिळाला! मजाच ना खरच तसं झालं असत तर.

वर्ष बदलतात महिने बदलतात पण आपण किती बदलेले असतो?
फार फरक पडलेला नसतो आपल्यामधे लिहिताना तारिख वार आणि उलटलेला काळ लक्षात ठेवायला बरं म्हणुन

..तरंग..

तुझी ओळख सांगत एकेक ओळ उमटायला लागली,
मी थांबले, हसले नुसतच....
थोडसं दुर्लक्षही केलं त्या प्रत्येक ओळीकडे.
भांबावल्या त्या ओळी जरा...
आश्चर्याने बघायला लागल्या माझ्याकडे!
एवढ्यात, पापणी लवली जराशी
अन्,
डहुळले गेले ते ओळीचे तरंग...
मनात क्षीण आनंद!
तुझी ओळख सांगत आलेल्या 'त्या' ओळी
माझ्या या कविते उमटू न दिल्याचा.