चक्रव्यूह

कदाचित दोष नसावा कवितांचा वा त्यातल्या शब्दांचाही,
कवितेची वळणं; तिथवर नजर पोचायच्या आधीच नाहिशी होतायत
आणि अर्थाचा गहिरेपणा उथळ झाल्यासारखा वाटतोय..
या शब्दांच्या भोव-यात अडकलं की असं होतं का?
का जखम कोरडी होत आली की असं होतं?
का दोनही गोष्टीत हेच होतं?
...
शब्दांची गरज म्हणून भोवरा फिरत राहतो आठवांचा
आणि हेच धरून ठेवायचं म्हणून शब्द जुळत राहतात.
चक्रव्यूहासारखं झालंय;
सगळं काही विसरावं तर शब्द हटून बसतात
शब्द सोडावेत तर मनातला नंदादीप अखंड तेवत असतोच...

असे वाटलेले आता; काही काही सुचणार नाही...

बरेच दिवस झाले ही एवढी एक ओळ आणि त्या ओळीच्या पाठीवर ओघवतीच आलेली अजून एक ओळ...एक श्वास ओलांडला अन  सांडलीही शाई!!

गम्मत आहे ना? अरे इथे स्पष्ट जाणवतय; आता आपण लिहिणार नाही आहोत; यापुढे, जमणार नाहिये आपल्याला लिहायला. पण मन मात्र दिलासा देतंय नाही नाही असं होणार नाहिये अजिबात बघ दोन ओळी सुचल्याच की नाही. सुचत राहील पुढेही.

मग इथे जर माझं मला जाणवतयं की आता लिखाण पुरे....तर दुसरीकडे मनात उमटलेली ही ओळ  काय सांगते.?