लिहीत जातो कशास आपण?

ही कविता सुचण्याला कारण, मेघनाचा खो :) धन्यवाद मेघना

लिहीत जातो कशास आपण?
लढवत बसतो शब्दांचे रण

शब्द पाहावा शब्दच गावा
शब्दातच जिवलगही दिसावा

कधी भासते लिहिणे मृगजळ
कधी ठसठसे जखमच केवळ

लिहून टाकू, होउ मोकळे
कळून येते जडावलेपण

कधी लांबते कधी थांबते
शब्दांचे हे अवघडलेपण

शब्दच कुंपण शब्दच शिंपण
शब्दच हरिमुरलीचे गुंजन

शब्दच तारा शब्दच वारा
काजळरात्री शब्द सहारा!

लिहीत जातो कशास आपण?

यशोधराच्या ब्लॉगवर, "मी का लिहिते?" या पोस्टला प्रतिसाद देऊन आले. आणि इतरही ब्लॉग्जवरचा हा खो-खो वाचला. वाचून विचारातही पडले, थोडीशी गंमतही वाटली खरंच, आपण का लिहितो? या प्रश्नावर प्रत्येक लिहिणा्-याचे अगदी गंभीर विचार वाचले. नकळत मन विचार करायला लागलं. खरंच का बरं लिहितो आपण? बरंच काही नवीन सापडलंही. या सगळ्या मंडळींमध्ये आपण काय लिहिणार. म्हणून मनातल्या मनातच लिहून, वाचूनही घेतलं स्वतःला. पण मेघनानी प्रतिसाद वाचला आणि लिही तू पण म्हणून खो दिलं. मग घेतलंच लिहायला. गद्य लेखन माझा प्रांत नाही. जे काही लिहिते ते अगदीच थोड्या शब्दात बोलून टाकायची फार वाईट(?) सवय आहे मला. मग का लिहितो हे लिहायला घेतल्यावर मात्र पंचाईत झाली आणि परीक्षा असल्यासारखं वाटायला लागलं. तरीही मी आपलं घोडं दामटावतीये पुढे

स्वतःला व्यक्त करण्याचा सोपा मार्ग. हे अगदी सरधोपट उत्तर आलं माझ्याही मनात. उंहू पण अगदीच एवढं कारण नसणार आपल्या लिहिण्यामागे हेही नक्की जाणवलं. बऱ्याचदा कविता लिहून झाल्यावर जाणवत, अरे हे काय? आणि का लिहिलंय आपण? मिळणाऱ्या प्रतिक्रिया? हे एक कारण आहेका? लोक वाह वा करतात, अहं सुखावला जातो म्हणून? असेलही कदाचित पण सगळ्याच लिखाणाला प्रतिसाद मिळतोच असं नाही मग तरीही लिखाण बंद करत नाहीच आपण. जे जसं सुचेल तसं लिहितंच असतो की. मग मिळणारे प्रतिसाद हे काही कारण नाही.

बऱ्याचदा लिहून झाल्यावर जाणवत, हे काय? खरंच मग असलं नकारात्मक लिहिण्याच काय हशील? पण लिहून मोकळं झाल्यासारखं वाटतं, आपल्या डोक्यावर असलेलं कसलंतरीच ओझं अलगद कोणीतरी काढून आपल्या हातात घ्यावं आणि आपल्याला एकदम मोकळं मोकळं वाटावं तसं काहीतरी. मग या लिखाणाला सकारात्मक उर्जा म्हणून बघायला काय हरकत आहे? मनातले नकारात्मक विचार कागदावर/ब्लॉगवर उरतावल्याने बरं वाटत असेल तर चांगलंच आहे की.

प्रत्येक लिखाणाची कारण वेगवेगळी असतील हे जाणवायला लागलंय आता. मागे औरंगाबाद खाद्ययात्रा लिहिली तेंव्हा, त्या त्या जागांना मनोमन भेटून आले, ते क्षण, तेवढ्यापुरते का होईना जगून घेतले होते. आठवलं. मग लिहिणं म्हणजे उलटून गेलेल्या क्षणांना पुन्हा जगणं असं म्हणता येईल? बरिच कारणं सापडली जे लिहिलंय त्याची आणि जे न लिहूनही उमटलंय त्याचीही.

या प्रश्नाने एक कविता मात्र सुचली,त्यातल्या सुरवातीच्या ओळी अश्या .

"लिहीत जातो कशास आपण?
लढवत राहतो शब्दांचे रण, "

यशोधरा, मेघना आणि इतर सगळ्याच दिग्गज ब्लॉगर्सना या खेळाबद्दल धन्यवाद.

अपेक्षाभंग.....कुणाचाही

ए.टी.एम मधून पैसे काढायला जाते तिथेच बाजुला भली मोठी मशीद आहे. तिथे मशीदिच्या बाहेरच्या पाय-यांवर एक बुरखा घातलेली बाई समोर एक डब्बा घेऊन बसलेली असते. मी आधी कधीच तीच्या डब्यात पैसे घातले नाहीत पण ४-५ महिन्यापूर्वी काय वाटलं कोणास ठाऊक मी थोडे फिल्स तिच्या डब्यात टाकले आणि मग ती सवयच झाली पैसे काढायला गेले की तीच्या डब्यात काही नाणी टाकूनच गाडीत बसायचं.

पण काल तिथे गेले पैसेही काढले आणि सुट्टे नव्हते म्हणून नाही टाकले तीच्या डब्यात पैसे. मी तिथून पुढे सरकत होते तेंव्हा तिने नेहमीच्याच अपेक्षेनं सलाम म्हणून डबा वरती उचलून धरला. माझा हात हालला पण मी नुसताच सलाम म्हणाले आणि पुढे जाऊन गाडीत बसले.

थोडासा रागच आला मला, की काय हे? एकदा दिलं म्हणून काय नेहमिच द्यायला हवं का? आणि नंतर मात्र उगाचच रुखरुख लागून राहिली मनाला. पहिल्याच दिवशी नसते दिले तिला पैसे तर तीचा हा अपेक्षाभंग टाळता आला असता मला.

आई

अतिशय नाजुक मन:स्थितित केलेली कविता, केवळ हरवून जाउ नये म्हणून इथे टाकून ठेवत्ये!

जाणारी ती
तीच्या वेळेवर गेलेली
माझी मात्र वेडी आशा उरलेली
अशी कशी ती गेली?
मला न भेट्ता
माझी चौकशीही न करत,
रात्री मी उठुन बसते
तीच्याच दिव्याशी जाते
आशाळभुतपणे दिव्यातच बघते
आई म्हणुन हाका मारते
वाटत
दिव्यातुन येईल
बाळा म्हणुन पोटाशी घेइल
परत परत मी हाका मारते
पण ती काही येत नाही
माझ्या हाकेला आणि
तीच्या वात्सल्याला
तो काही दाद देत नाही
कारण ती गेलेली
आणि मी मात्र
मागे राहिलेली