कधी उगाचच..

कधी उगाचच असे वाटते व्हावे सुरेल गाणे..
कधी उगाचच कसे वाटते रहावे उदासवाणे?

कधी उगाचच कशी पडावी जगावेगळी स्वप्ने?
कधी उगाचच बरे वाटते भ्रमात ऐसे जगणे

कधी उगाचच वाटून जाते  जवळ  असावे कोणी
कधी उगाचच असे वाटते  हरवावे घनरानी 

कधी उगाचच हवी वाटते ग्रीष्मामधील तृष्णा
कधी उगाचच जाळून जातो  नभीचा  चांदण उष्मा

कधी उगाचच असे कशाने गंधीत होते अंगण
आणि उगाचच असे वाटते भेटून गेला साजण..

कधी उगाचच असे वाटते चंद्र लपेटून घ्यावा..
कधी वाटते आकाशी  ता-यावर झोका घ्यावा

कधी उगाचच झूठ वाटती कवितेमधल्या ओळी
कधी उगाचच डोळा पाणी निरभ्र संध्याकाळी

कधी उगाचच...

No comments: