असे वाटलेले आता; काही काही सुचणार नाही...

बरेच दिवस झाले ही एवढी एक ओळ आणि त्या ओळीच्या पाठीवर ओघवतीच आलेली अजून एक ओळ...एक श्वास ओलांडला अन  सांडलीही शाई!!

गम्मत आहे ना? अरे इथे स्पष्ट जाणवतय; आता आपण लिहिणार नाही आहोत; यापुढे, जमणार नाहिये आपल्याला लिहायला. पण मन मात्र दिलासा देतंय नाही नाही असं होणार नाहिये अजिबात बघ दोन ओळी सुचल्याच की नाही. सुचत राहील पुढेही.

मग इथे जर माझं मला जाणवतयं की आता लिखाण पुरे....तर दुसरीकडे मनात उमटलेली ही ओळ  काय सांगते.?

मौन

मौन म्हणते थांब आता
शब्द तुझे झाले पुरे
बोलणे त्याचे खरे कि
थांबणे माझे खरे?

थांबणे माझे क्षणांचे
अर्थांचे झरती झरे
उमगले काही मला
इतुकेही आहे ना पुरे
?

चारोळी

कळू नये जगाला काही
हीच असावि वा-याची निती
गहिवरते मायेने याच्या
ओलेती सर होते रिती

जरा मनानी हलके व्हावे

जरा मनानी हलके व्हावे
थोडे वाहून परतून यावे
मेघ जांभळा जरी आकाशी
हसून त्याही थांब म्हणावे

जशा कैक होत्या व्यथा गोंदलेल्या

सुचावे न काही रुचावे मनासी
अशी हाय कोठून येते उदासी?

अबोलीपरी गंध घ्यावा मिटोनी
अताशा असे वाटते मोग-यासी

न कळते स्वत:ला असे काय होते
खुलासे कसे काय देऊ जगासी ?

उगवती नि ढळती कुठे चंद्रतारे?
उमजते न काही अता अंबरासी

जशा कैक होत्या व्यथा गोंदलेल्या
तसे नोंदले मी तुलाही समासी