संध्येच्या पारावरती

संध्येच्या पारावरती

 संध्येच्या पारावरती विस्कटले ऊन्ह जरासे
मग उगाच ऐकू येती दिवसाचे क्षीण उसासे

संध्येच्या पारावरती कल्लोळ अस्वस्थांचा...
काळोख दाटुनी येतो उजळल्या गत जन्मांचा

संध्येच्या पारावरती प्रश्नांची बैठक भरली
न्यायनिवाड्याआधी शिक्षेची सुटका झाली

संध्येच्या पारावरती चुकलेले हंबर कानी
मन शांतपणाचे त्याला घालतसे चारापाणी

संध्येच्या पारावरती प्राणाची धडपड नुसती
हा देह सुटेना अजुनी; नि:स्तेज तेवते ज्योती

चल खेळू या...

चल खेळू या...
डाव मांडून तुझं खुल्या दिलांन, आमंत्रण,
म्हटल, चला खेळू या.
मी तुझ्या बाजुनी खेळणार, म्हटल, वा!
मग पलिकडे कोण? नाही तसं नाही तिकडेही मीच खेळणार;
अं? म्हणजे...
मी तुझ्या बाजुनी खेळणार,
मीच माझ्याही बाजुनी खेळणार.
चल खेळू या?
दान तुझ्यात हातात असणार..
खेळाचे नियम तेही तुझेच
हरकत नसेल माझी
दिवसेंदिवस चालला खेळ तरी चालेल
चल खेळू या...!
तू पाऊस आण, नखशिखांत भिजव
तू उन्ह पाड....लाही लाही करुन सोड
तू शिशीरात पाने गाळ,
तू वादळानी उध्वस्त कर
तू लाटामधे दडव सगळं
आणि विचार मग.... चल खेळू या?

भक्तवत्सल

मी विसरायचे नाही फुलं वाहायला...
तुझ मात्र तुलाच लक्षात ठेवावं लागेल
कुठे, कधी, कसं, प्रगट व्हायचं; का नुसताच दृष्टांत द्यायचा...
का यापैकी काहीच न करता तटस्थ रहायचं.
तसंही, माझी तुझ्यावरची श्रद्धा अबाधित राहू दिलीस
आणि अजून मला नतमस्तक व्हायला लावतोस
हे ही कमी नाहीये म्हणा...
याला भक्तवत्सलता म्हणत असावेत.... तुझ्या जगात.

एकच व्हावा घाव सणाणून


एकच व्हावा घाव सणाणून श्वासही जावा क्षणी ओसरून
प्रश्नही सुटतील, सरतील आशा; नसता जीवन कुठे निराशा?
त्या आधीपण असे घडावे; ओल सुकावी हृदयामधली,
स्नेह नसावा कोणाचाही,लोभ सुटावा सगळ्यामधला..
नको कुणीही मार्गावरती हाक मारण्या पाठी येवून

रेंगाळत मी उगाच फिरता; आठवतील मग जुनीच गाणी
आणि कुणाला तश्यात माझ्या डोळ्यातील मग दिसेल पाणी
पुन्हा नव्याने घडेल सारे, पुन्हा वाढतील व्यर्थ पसारे
बास जाहले अता ईश्वरा! नाही समजत तुझे इशारे...
काय हशिल तू सांग एकदा; अजून राहू कितीक थांबून?

एखादाच शब्द...एखादीच ओळ..

कविता सुचताना....वा सुचत नसताना ; सुचलेलं काहीतरी, कसही काहीही म्हणता येईल.

कवितेची पहिली ओळ लिहून झाली की आपलं माकड. मग त्या ओळीच्या, शब्दाच्या मागे मागे अगदी दूरदूर भटकत कुठल्या कुठे....कुठलातरीच प्रवास,  डिलिटवर क्लिक करुन  नजरेआड  सरकवलेला अमर्यादित कचरा. छे! छे ! नाद सोडायला हवा या बाईचा. कायच्या काय कटकट नायतर .

ती खेळवत राहते आपल्याला. अगदी नवीन नवीन लिहायला लागल्यावर,  लहान मुलाच्या हातावर अगदी खडीसाखरेचा खडा ठेवल्यावर सुद्धा त्याचे डोळे लकाकतात तशी  पदरात एखादी ओळ पडली तरी वाटत; आहा!..वा! वा!, क्या ब्बात है! छे भलतच, फारच मस्त  लिहिलय की आपण. चला चला पुढे...बास झालं रेंगाळणं.

इथेच फसलात तुम्ही  हो अगदी मस्स्स्स्त फसलात...जराशी पाठ  थोपटते आणि आपल्याला पुढे फरफटत नेते
ही कविता. मग त्या त्या कवितेच्या मूडप्रमाणे तुमच पुन्हा माकड , हम्म!

मग पुढली ओळ....अजून पुढे...अजून पुढे......अडकलात पुरते आता सुटका नाही. ही कविता तुम्हाला आयुष्य देऊन जाणार (का आयुष्यच होऊन राहणार)?

 कायच्याकायच खरं  तर, लिहिणा-यांच काय म्हणणय म्हणे?